हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २ जून, २०१२

अणुऊर्जेला जर्मनीत विरोध

सदर लेख २०११ मध्ये सकाळ मधील पैलतीर ह्या अनिवासी भारतीयांच्या हक्कांच्या व्यासपीठावर प्रकशित झाला होता. तेव्हा भारतात आय एम अण्णा
ह्या आंद्लोनाचे पडघम सुद्धा वाजले नव्हते.
प्रगत देशात अणु उर्जेला समर्थ पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जास्त्रोताचा विकास करावा ह्या मागणीसाठी सोशल नेटवर्किंग द्वारा संपूर्ण जर्मनीत लोक रस्त्यावर उतरली. म्युनिक मध्ये अश्याच एका आंदोलनात माझी जर्मन पत्नी तिची बहिण व मी सहभागी झालो. होतो. त्याबद्दल हा संशिप्त वृत्तांत
तळटीप
आम्ही एवरी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक अथवा विरोधक नसून
जर आपल्यापुढे पर्याय असेल तर अपारंपरिक उर्जास्त्रोत भविष्यात विकसित केला जावा ह्या उद्देशापोटी आम्ही ह्या आंदोलनात सहभाग घेतला होता. पुढे सरकारने जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या. व त्यावेळी अहिसंक पद्धतीने सुद्धा सामान्य जनता न्याय जर जर्मनीत मिळवू शकते तर आपल्या भारतात का बरे अशी चळवळ होत नाही असा प्रश्न किंबहुना वणवा पेट घेत आहे अशी मी त्यावेळी माझ्या लेखाचा शेवट केला होता.



जपान येथील भयावह दृश्ये व अणू भट्टीच्या बातम्या पाहून म्युनिक मध्ये आमच्या कार्यालयातून ह्या विषयी चर्चा सुरु झाल्या . जपान अणू भट्टी उभारण्यास जर्मन कंपनीचा हातभार होता. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोलमडून पडलेल्या अणू भट्टीच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत ऐरणीवर आला होता.
आमच्या शहरालगतच इसारा-१ ही मोठी अणुभट्टी आहे. २००१ मध्ये जर्मनीत कायदा संमत झाला की, 'जर्मनीतील सर्व अणुभट्ट्या टप्याटप्याने बंद करायच्या व अपारंपरिक उर्जा स्त्रोत वाढवायचे'. ह्यासाठी जर्मन सरकारने २००५ ते २०१० मध्ये तब्बल ८०० मिलियन युरो वेगळे काढून ठेवले होते.

यात प्रामुख्याने प्रमुख पर्याय आहे- पवनउर्जा (पवनऊर्जा निर्मितीत अमेरिकेनंतर जगात जर्मनीचा दुसरा क्रमांक लागतो) जर्मनीत २१,६१४ ठिकाणी पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. सत्तर हजार लोकांना नोकरी देणारे हे क्षेत्र एकूण गरजेच्या ७ % उर्जा निर्माण करते. सौरउर्जा हा अजून एक महत्वाचा स्त्रोत. जर्मनीतील एरलासी सोलर पार्क हे जगातील सर्वात मोठे सोलर पार्क असून दक्षिण जर्मनीतील बव्हेरीया प्रांतात आहे. अनेक लोकांनी आपल्या घराच्यावरती सौरउर्जेचे तंत्रज्ञान वापरून विजेचा सोपा आणि स्वस्त मार्ग स्वीकारला आहे . सध्या २% उर्जा सौरऊर्जेपासून मिळत असली तरी जाणकारांच्या मते २०५०पर्यंत २५% पर्यत उर्जेची गरज भागवता येऊ शकते. इतर अनेक पर्याय जे जियो थर्मल ऊर्जा किंवा हायड्रो उर्जा जी सध्या ३.५ % उर्जेची गरज भागवते. २००९ मध्ये जर्मनीत १६ % उर्जेची गरज हे अपारंपरिक स्त्रोत पूर्ण करतात तर अणुउर्जा ११ % त्यामुळेच टप्याटप्याने ह्या अणुउर्जेचा वापर कमी करणे सहज शक्य आहे.


पण अचानक चॅन्सेलर अँजेला मर्केल ह्यांनी त्यांच्या पूर्वीच्या धोरणाविरुद्ध जाऊन अणुउर्जेला जीवदान द्यायचे ठरवले. तेव्हापासून येथील जनतेत संताप आहे व फसवणूक झाल्याची भावना आहे. आण्विक कचऱ्याचे काय करणार? ह्यावर जनतेला अजून स्पष्ट उत्तर मिळाले नाही आहे. त्यामुळे विविध संस्था काही महिन्यांपासून निदर्शने करत आहेत. सध्या जपानच्या आण्विक समस्येमुळे म्युनिक येथे सुद्धा ह्याबाबतीत विरोधाला धार आली आहे. म्युनिक शहर हरित बनवण्यासाठी प्रयत्नशील ग्रीन सिटी म्युनिक ह्या संस्थेचे एक सदस्य आमच्या कार्यालयात आहेत. त्यांनी आम्हा नवरा बायकोस त्यांच्या अणुउर्जाविरोधाची जुजबी माहिती देऊन पुढील माहिती 'फेसबुक'वर देतो असे सांगितले. आम्ही घरी येण्याआधी आम्हाला सविस्तर माहिती देण्यात आली होती.


म्युनिक शहराच्या मध्यभागी १४ मार्चला निदर्शने होणार होती. आम्ही जायचे कबूल केले.


जपानच्या मृत व्यक्तींना श्रद्धांजली व मग निदर्शने होणार होती व त्यानंतर सामान्य लोकांना आपापली मते मांडायला संधी मिळणार होती. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे स्टिकर्स, पोस्टर व इतर गोष्टी त्यांच्या साईटवरून विकत घेतल्या. स्वतः एक फलक घेऊन त्यावर चॅन्सलर मर्केल ह्यांना खास संदेश लिहून आम्ही तेथे साडे सहाच्या सुमारास पोहोचलो. हळू हळू लोकांचे तांडे जमू लागले होते. चौकात मध्यभागी ह्या संस्थेच्या फक्त १५ जणांनी येऊन काही मिनिटांत एक तंबू ठोकला व इतर तयारी सुरु केली. हे लोक हजारोंच्या समूहाला कसे हाताळणार ? ह्याचे कुतूहल माझ्या मनात होते. 
नियोजित वेळी सात वाजता सभा सुरु झाली. प्रत्येक वक्त्यांनी थोडक्यात आपले म्हणणे मांडले. त्यात 'सरकार काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आपल्याच मूळ धोरणांशी कशी प्रतारणा करत आहे' ह्या मुख्य मुद्याभोवती इतर शास्त्रीय माहिती व मागील अर्थकारण व सरकारांच्या विधानांचा फोलपणा ह्या संदर्भात माहिती देण्यात येत होती. काही हजारांच्या संख्येत समूह जमला होता. प्रत्येक भाषणाच्या शेवटी 'बंद करा /बंद करा' अश्या घोषणा येत होत्या.

ह्यात आम्हाला एक चाळिशीचे जोडपे भेटले. ज्यांची भविष्यातील पिढीला हरित उर्जा मिळावी यासाठी कळकळ दिसून आली. तर शाळेतील एक कपल भेटले. ते मास्क लावून उंच उभे राहून घोषणा देत होते. ह्या संस्थेचा त्यांच्या शाळेत विविध उपक्रम होतात त्यात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग असतो. आमच्यासारखे अनेक जण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एका हाकेवर पहिल्यांदा आले होते. त्यामुळे हा विषय व त्यांचे गांभीर्य समजावून घेत होते.
आपल्या भारत देशात विजेच्या बाबतीत कुपोषण असल्याने अणू उर्जेला पर्याय नाही हे जरी सत्य मानले तरी आपल्या देशावर सूर्य नारायण व वायूची प्रचंड कृपादृष्टी आहे. मोकळ्या माळावर फोफवलेला भन्नाट वारा असो किंवा एकवेळ मान्सून दगा देईन १२ महिने नित्यनेमाने हजेरी लावणारा सूर्य असो. आपण ह्या पंचमहाभूतांना देव मानतो. मात्र तरीही ह्यांच्या ऊर्जेचा वापर आपल्याकडे का होत नाही? 'स्वदेस'सारखा सिनेमातून आपण काहीच बोध का घेत नाही? असे अनेक प्रश मनात आले.

सभा संपली त्यांनी पुढे कोठे, कोणत्या शहरात निदर्शने व मोर्चे होणार आहेत ह्याची माहिती दिली.



आम्ही घराकडे जातांना ट्रेनमध्ये अनेक मोर्चेकरी होते. चर्चा सुरु होती. देशभर आतापर्यत ७० हजारांच्या आसपास लोकांनी निदर्शने केल्याचे समजले. आमची बोलणी कानावर पडल्याने इतर प्रवासीसुद्धा ह्याबाबत जाणून घेत होते. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे मर्केल ह्यांच्या नावाने येथील निदर्शनात मोठ्याने अजिबात शिमगा झाला नाही. आमचा लढा व्यक्तीशी नाही तर प्रवृत्तीशी होता.

ह्या हरित उर्जेस पाठिंबा देणारे पक्ष जर्मन संसदेत लढा देतीलच पण सामान्य नागरिक म्हणून आपल्या भावना सरकारकडे पोहोचल्या पाहिजे नुसते. आभासी जगतात ट्विटर किंवा फेसबुक वर निषेध नोंदवून आमचा कार्यभाग संपला नाही, ह्याची जाणीव झाली होती. सोशल नेटवर्क ही एक क्रांती आहे. आता सामान्य माणसे आपल्या घरात चहाच्या पेल्यासोबत नुसत्या चर्चा करणार नाहीत. आता चहाच्या पेल्या आतच वादळे निवणार नाही '.
ही एक सुरवात आहे...
माझ्या मनात अवधूत गुप्तेच्या गाण्याचे बोल आले 'सावधान, सावधान, वणवा पेट घेत आहे.'

मी लेखात उल्लेख केला होता  तसा आपल्या कडे काही महिन्यानंतर  महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प जर्मन कंपनी स्वतः गुंतवणूक करून धुळ्यात उभारणार होती अशी बातमी वाचली होती. मात्र सध्या तो प्रकल्प धूळ खात पडला आहे. व आपल्या पाठून गुजरात येथे अनेक सौर उर्जा प्रकल्प उभे राहत आहेत.

५ टिप्पण्या :

  1. धन्यवाद सलीलदा
    ह्या आंदोलनामुळे मर्केल सरकारने आधीच्या सरकारचा निर्णय परत अमलात आणण्याचे ठरविले, २०२२ साली शेवटची अणुभट्टी बंद होणार म्हणूनच बहुतेक ऑस्टेलिया ला आपली धोरणे बासनात गुंडाळून भारताला युरेनियम विकायला सुरवात केली कारण जगभरात सर्वाधिक साठा युरेनियम चा असणाऱ्या ह्या राष्ट्राचे खरेदीदार जगभरातून रोडावले आहेत.
    भारताला विकासाठी अणुउर्जा हवी आहे कारण प्रगत देशांनी ६० ते आजतागायत स्वतःच्या प्रगतीत ह्या उर्जेचा वापर केला आहे.
    मात्र पवन उर्जेची सयंत्र आपल्याकडे शेतकर्यांनी ढग पळवून लावणारे यंत्र म्हणून
    अनेक ठिकाणी बंद पाडले.
    भारताला स्वतंत्र उर्जा धोरण तातडीने हवे आहे.
    तर सौर उर्जेत मोडी सरकारने अनेक प्रकल्प गुजरात मध्ये राबविले आहेत.
    माझ्या राहत्या म्युनिक शहर्राला वीजपुरवठा ज्या अणु भट्टीतून होतो ती जर्मन सिमेन्स कंपनीची संयंत्रे असणारे अणु प्रकल्प जपानने बंद केले तेव्हा त्यांच्या धंद्यासाठी जर्मनीत मागील सरकारचा निर्णय बदलविण्याचे निर्णय घेतला गेला. जो जनतेने हाणून पाडला. पण ह्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी एखादी व्यक्ती करत नव्हती हे एक विशेष

    उत्तर द्याहटवा
  2. जरूर शेअर कर
    अपारंपरिक उर्जा ही काळाची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips